गरम पाण्याचे कुंड, उन्हेरे।
पृथ्वीवर असणाऱ्या अनेक चमत्कारां पैकी एक चमत्कार म्हणजे गरम पाण्याची कुंडे किंवा झरे। यांनाच उन्हेरे म्हणतात। आणखी इतरही नावे आहेत। पृथ्वी च्या पोटात घडणाऱ्या प्रक्रियांमुळे हे पाणी गरम होते। जमिनीत च्या वर येते। यालाच इंग्रजी मध्ये हॉट स्प्रिंग असे म्हणतात। अशी उन्हेरे नेहमी ज्वालामुखीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतात। कारण पावसाचे पाणी जमिनीत मुरले की ते गरम होते। तसेच काही पाण्याची वाफ पण होते। मग हे पाणी खडकामध्ये असलेल्या फटीतून बाहेर येते। या पाण्यात अनेक खनिजे तोपर्यंत मिसळली जातात। बहुदा जास्त प्रमाणात गन्धक असते। असे हे पाणी औषधी पाणी होते। या पाण्यात आंघोळ केल्यास त्वचा रोग बरे होतात, ते याच कारणामुळे।आपल्या देशात एकूण 340 ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत। महाराष्ट्रात 28 ठिकाणी हे झरे असल्याची नोंद मी अंतर जालातून घेतली आहे। त्यापैकी 1. अकलोली 2. उनकेश्वर 3. उनपदेव 4.उन्हेरे 5.गणेशपुरी 6.खेड 7.तुरळ 8.देवनवरी 9. राजवाडा 10. राजापूर 11.वज्रेश्वरी 12.सव 13. सातीवली 14.सूनपदेव 15.पाली ही मी मिळवली आहेत।
दीपावलीच्या सुट्टीत अष्टविनायक दर्शन झाले। शेवटचा गणपती पालीचा होता। मुक्काम पाली येथे भक्त निवास मध्ये केला होता। झोपतानाच सकाळची आंघोळ उन्हेरेला करायची असे ठरवले होते।
सकाळी 7:30ला पालीचे भक्त निवास सोडले। जायच्या आगोदर दात घासुन घेतले होते, पण आंघोळ केली नव्हती । आंघोळ सरळ कुंडातच करण्याचा विचार होता। झालेही तसेच । 15 मिनिटात कुंडाजवळ उभा होतो। गाडी पार्किंगला लावली। आवश्यक वस्तू टॉवेल, बनियन वगैरे घेऊन कुंडाजवळ गेलो।सरळ कुंडातच उतरलो। पाणी चांगलेच गरम होते।पण हिवाळा असल्याने जाणीव झाली नाही।जवळजवळ एक तास कुंडातच बसून होतो। खूप खूप आनंदी, समाधानी व फ्रेश वाटले।
या ठिकाणी एकूण तीन कुंड आहेत। दोन बंदीस्त केलेली आहेत। त्या दोन पैकी एक महिलांच्या साठी तर दुसरे पुरुषांच्या साठी आहे। या दोन कुंडातील पाणी आंघोळ साठी आवश्यक तेवढे गरम आहे। पण तिसऱ्या कुंडातील पाणी जास्त गरम आहे। बंदिस्त दोन कुंडात लाकडी फळ्या टाकल्या आहेत। त्यामुळे त्यात उभा राहून अंघोळ करता येते। तर तिसऱ्या कुंडात लोखंडी जाळी टाकली आहे। मी मात्र तिसऱ्या कुंडातच उतरलो। पाणी जास्त गरम असले तरी। माझ्याबरोबर माझा मुलगा अथर्व हाही त्याच कुंडात होता, हे विशेष।
याठिकाणी अंघोळ करताना साबण, शाम्पू लावणे टाळावे।तसेच चुळा या पाण्याने भरू नयेत। या पाण्यात पोहू नये। तसेच हे पाणी पिऊ नये। या ठिकाणी पाळीव प्राणी नेऊ नयेत। ही काळजी आपण स्वतः हुन घेतलेली बरी असे मला वाटते।















