Thursday, May 31, 2018

गड देवधर, उस्मानाबाद।

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

*गड देवधर, उस्मानाबाद.




*

=================

             माझी बदली पांगरी हुन आंबेजवळगे या शाखेत झाली होती। माझ्या शालेजवळून गड दिसत होता। गड बघून माझे मन नेहमी उचल खाई।पण तेथे जायला 2015 साल उजडले।
          एके शनिवारी मी माझ्या सहकारी मित्रांना गड येथे जायचे सुचवले। अर्थात लगेच मान्य झाले नाही। शेवटी सगळे तयार झाले। चार दोन चाकी वर प्रत्येकी दोन दोन जण बसलो। आणि निघालो।
              जाताना प्रथम रेलवे पूल गड देवधर चा पहिला। जणू काय कोकणात आहे असा रुबाब आहे त्या पुलाचा। त्यानंतर रेलवे बोगदा पहिला। हा बोगदा साधारण 1600 मीटर लांबीचा आहे।
त्यानंतर गडाचे दर्शन घेतले।
 वेळ शिल्लक होता म्हणून आम्ही रामलिंग कडे निघालो। मंदिर पहिले। दर्शन घेतले। गर्दीचा प्रश्न नव्हता। त्यानंतर तेथे रामलिंग गुरुकुल आश्रम आहे, त्याला भेट दिली। आश्रमात चवनप्राश उच्च दर्जाचा होता। तो मी घेतला। शेवटी बार्शीला घराकडे निघालो।
             हि ट्रिप खूप आठवणीत आहे कारण सर्व स्टाफ बरोबर होता।

🐋🐋🐋🐳🐳🐳


काजवा महोत्सव, राधानगरी।

        ३० मे रोजी कोल्हापूर ला जायचे ठरले होते। सकाळी कोल्हापूर-नागपूर ट्रेन पकडली। २ वाजेपर्यंत कोल्हापूर मध्ये पोचलो। तीन-चार दिवस मुक्काम होता । मग काय पाहायचे ? असा विचार मनामध्ये होताच। बराचसा भाग पाहून झाला होता। त्यामुळे मी गोंधळात होतो। सहज भटकंती ग्रुप चाळत होतो। काय सापडते का ? हाच उद्देश। मग आडवाटेवरचे कोल्हापूर हि पोस्ट पहिली। तिची माहिती मिळवली।२७ मे ला हि सहल संपली होती। आता काय ? प्रश्न उभा। मागच्या पोस्ट मध्ये काजवा महोत्सव हि पोस्ट नदाफ सरांनी टाकली होती। मग हेच कायम केले।
            मी एकटा कधीच जात नाही। शक्यतो पत्नी बरोबर असावी , असा माझा शिरस्ता आहे। म्हणून फोन करून विचारले। तिकडून नकारघंटा मिळाली। आता दुसरा मार्ग अवलंबला। आपल्या व्हाट्सअप्प ग्रुप वर पोस्ट टाकली कोण येणार आहे का ? कोणाचाही प्रतिसाद नाही। मग शेवटी उपाय म्हणून नदाफ सरांना फोन केला, ' तुम्ही येणार का ?' त्यांना दुसरे काम असलेने त्यांचेही उत्तर नाही असेच होते। शेवटी एकट्यानेच जायचे ठरवले।
                  एकटाच जाणार असल्याने कारची गरज वाटली नाही। सरळ स्कुटी घेतली आणि निघालो। माझा हा निर्णय चुकीचा होता। हे पुन्हा सिद्ध झाले। पण नाईलाज होता।
                   कोल्हापूर तर राधानगरी हे अंतर ५० किमी पेक्षा जास्त नव्हते। जायला दीड तास लागेल असे वाटले होते। पण सभोवताचा निसर्ग पाहून गाडीचा वेग काय वाढला नाही। जाताना दोन मंदिरे लागली । प्रथम दत्त मंदिर व नंतर अंबाबाई मंदिर। गडबड व जायची घाई असलेले दत्त मंदिरात पाया पडून लगेच निघालो। फारसे काही पहिले नाही।
              पुढे गेल्यावर मात्र उगीच चुकल्यासारखे वाटले। फोटो नाही, बारीक निरीक्षण नाही, मूर्ती पण नीट आठवत नव्हती। असे कधीच झाले नाही। माझ्या या कृतीचा धिक्कार मीच मनातल्या  मनात केला।
                यानंतर मात्र अंबाबाई मंदिरात असे केले नाही। हे मंदिर मुख्य रस्ता चिटकून उभे होते। एका बाजूला सरळ डोंगर कोरलेला होता। आत प्रवेशासाठी कमान वैगेरे काही नव्हती। तरीपण समोरचे मंदिर खूप सुंदर दिसत होते। सभामंडप आताच्या काळातील सिमेंट काँक्रीट चा होता। त्यावर नक्षीकाम असे काही नव्हते। सरळ धोपट स्लॅब होता। गाभाऱ्या कडे जाताना सिंहाची मुर्ती विलोभनीय होती। अंबाबाई ची मूर्ती मात्र जुनी ,प्राचीन असल्या सारखी वाटली। दर्शन घेतले। बाहेर आलो। पुढील मार्गस्थ झालो।
              घरून मी सव्वा पाच नंतर निघालो होतो। त्यामुळे आता दिवस मावळू लागला होता। त्याच वेळेला मी घाट चढत होतो। घाटाच्या कडेला पायऱ्या पायऱ्या केलेल्या दिसत होत्या। त्या काय असा प्रश्न होताच। विचारायचे कुणाला हा प्रश्न होताच। कारण रस्त्याने जाणार मी एकटाच होतो। वेगवेगळ्या गाड्या, कार, टिप्पर येत होते।पण थांबत नव्हते कोणी। थांबवून विचारायचे तरी कसे ? थोडे पुढे गेल्यावर एकजण निवांत बसलेले दिसले। ते बहुतेक जेसिबीचे चालक असणार असा माझा अंदाज होता। कारण जेसीबी जवळच उभा होता। काहीही असो , आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळवणे हेच मनात होते। त्यांना विचारल्यावर कळले कि , हि पायऱ्या पायऱ्यांची शेती आहे। इथे भाताचे पीक घेतले जाते। आता उन्हाळा असलेने ते रिकामे आहे।
           ही माहिती घेऊन मी पुढे गेलो। घाटमाथ्यां जवळ असण्याची शक्यता असेल। कारण तेथून सूर्यास्त खूपच छान दिसत होता। अतिशय विलोभनीय निसर्गाची किमया मी पाहत होतो। जणू काय महाबळेश्वर किंवा दुसऱ्या सनसेट पॉईंटवरच उभा आहे। विशेष म्हणजे आता उन्हाळा असला तरी थंडीची जाणीव होत होती। समोरच्या डोंगराला धुक्याची चादर ओढताना मी जवळून पाहत होतो। हळूहळू धुक्यामुळे बराचसा भाग दिसेनासा झाला। मीही भान हरपून पाहत आहे, याची जाणीव झाली।
                 थोडे पुढे गेलो कि , काजवा महोत्सव कडे असे बॅनर दिसले। राधानगरी शहर येथून ६ किमीच्या पुढे होते। आता प्रश्न पडला शहरात जायचे काय?
             याची तजवीज मी दुपारीच करून ठेवली होती। मी सम्राट सर, काजवा समिती सदस्य यांना फोन केलेला होता। मी येणार आहे अशी कल्पना दिलेली होती। लगेच त्यांना दुसरा फोन करून खात्री केली। तेथूनच जायचे होते। शहरात जायची गरज नव्हती। तेथून चार किमी आत गेलो। पोलीस बॅरिगेट पासून कच्च्या रस्त्याने दीड किमी आत गेल्यावर पाच सात गाड्या दिसल्या। मग मात्र हायसे वाटले। कारण तो घनदाट झाडीचा परिसर होता। दिवसा सुद्दा उन्हाला जमीन दिसायची कमतरता। मग सम्राट सर यांची ओळख करून घेतली। काजवांची माहिती घेतली। आजूनही वेळ शिल्लक होता। म्हणून सरांच्या निर्देशाने काळम्मावाडीचे धरण पाहण्यास निघालो। वाटेत पन्हाळा चे काटकर भेटले। त्यांनाही धरण पाहण्यास घेतले। २ किमी गेल्यावर धरणाजवळ पोचलो। सन २०११ पासून धरणावर जाण्यास बंदी आहे हे समजले। माझी निराशा झाली। जरा खालच्या बाजूस जाऊन धरण पहावे लागले। याचे नाव दूध गंगा धरण होते। धरण मध्यम आकाराचे होते। पण खूपच भोवताली जंगल होते। परत काजव्यांकडे आलो। साधारण ७ ते ८:३० पर्यंत काजवे पहिले। काजव्यांचे फोटो काढता आले नाहीत हि सल मनात आहे।
             साधारण दीड तास काजवे पहिले। सम्राट सरांनी दाखवलेला रोडने मी काजवे पाहत होतो। मी ७००ते८००मीटर आत गेलो ,हे कळलेच नाही। माझ्या बरोबरची माणसे कधीच मागे पडली होती। मग मात्र मी मागे आलो। जेवढा अंधार असेल तेवढा निसर्गाचा चमत्कार पूर्ण क्षमतेने दिसायचा। एक काजवा मी पकडला सुद्धा। त्याच्या शरीराच्या शेवटच्या भागातून हा प्रकाश येतो। यात कोणत्याही ऊर्जेचा अपव्यय होत नसल्याने हा शीतल किंवा शांत प्रकाश होय। काजव्यांच्या पोटात असलेल्या लुसिफेरान रसायनांचा हा प्रताप आहे हे नंतर कळले।
               आता मात्र घरून फोन यायला लागला होता। मी जावई आहे ,याची जाणीव फोनने झाली। मी स्कुटीकडे निघालो, तेव्हा रुपेश सरांनी थोडे थांबून जा, असे सांगितले। कारण पुढे गवा दिसला आहे। थांबून मी एका कारच्या मागेमागे पाच किमी आलो। सगळे डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य डोळ्यात साठवून घर गाठले।




















Monday, May 28, 2018

महादेव मंदिर , शिखरशिंगणापूर।

             चार वाजता कार्यक्रम आटोपल्यानंतर मी थोडा सुटकेचा श्वास घेतला। माझा सरळ बार्शीला जायचा काही विचार नव्हता। काय पहावे हे विचार करत असताना शिखरशिंगणापूर सुचले। येथे जाऊन मला सात-आठ वर्ष झाली होती। तरीपण मन वळलेच।
               मंदिर आमच्यापासून ५० किमी दूर होते। पण मी ५५ मिनिटात येथे पोचलो। या मंदिराकडे जाण्यासाठी दोन रस्ते आहेत। पहिला अगोदरच लागतो। तो पायथ्याशी जातो। मग पायऱ्या चढून वर जावे लागते। मागे मी गेलो होतो त्यावेळी हाच मार्ग निवडला होता। आता अंगात त्राण नव्हते आणि चालण्याची इच्छा पण नव्हती। त्यामुळे दुसऱ्या मार्गाचा आवलंब केला। सरळ पायरी पासून थोड्या अंतरावर गाडी पार्क केली। आजून पण २५ ते ३० पायऱ्या चढण होती। पायऱ्यांच्या दुतर्फा दुकाने होती। ते विविध वस्तू विक्रीसाठी साद देत होते। मी पण गाडी पार्किंग जवळच्या दुकानात नारळ, दवणा, हार वगैरे घेतले होते। वर जाताच माझी घोर निराशा झाली। मंदिर दर्शन रांग २ तासाची होती। तरीपण मी दर्शनाची आस सोडली नाही।
                 हे महादेव मंदिर










अनेकांचे कुलदैवत आहे। हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादवकालीन राजा सिंदन याने वसवले असे इतिहासामध्ये सापडते। या मंदिराला दगडी तटबंदी आहे। ती तटबंदी अजूनही खूपच भक्कम आहे। येथील जुने मंदिर पडल्याने आताचे नवीन बांधले गेले असे समजते। मला आवडलेली बाब म्हणजे याचे शिखर होय। अप्रतिम ,कोरीवकाम व नक्षीकाम या मंदिराच्या शिखरावर आहे। तसेच रंगसंगती पण मनाला मोहून टाकणारी आहे। तीन दिवस तरी हे नक्षीकाम पाठ सोडेल असे वाटत नाही। जेथून रांग चालू होते त्याजवळच नवीन सुबक प्रवेशद्वार नवीन बांधले आहे।
            हळूहळू रांग पुढे सरकत होती। २ तासांनी मी मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला। हा सभा मंडप व घृष्णेश्वर चा मंडप अगदी सारखे वाटले। काहीच फरक नव्हता। दगडी खांबावर सुबक नक्षी काढलेली होती। थोडे पुढे गेल्यावर मंडपातील नंदी दिसले। तेही पाच नंदी होते। सर्वाना पितळी पत्रा लावलेला होता। हे दृश्य खूपच विलोभनीय होते। आत जाताच मुख्य मूर्ती दिसली। त्यावर काळ्या पाषाणाची सुबक मूर्ती होती। पाहून मन भारावून गेले। दर्शन घेऊन मी बाहेर पडलो। 

समर पॅलेस, बेंगलोर।

        बेंगलोर मध्ये पर्यटनाची सुरुवात समर पॅलेस









पासून केली। येथे पोचल्यावर पहिली समस्या गाडी पार्किंगची होती। गाडीची थोडी काच खाली करून सिग्नलला शेजारच्या रिक्षावाल्याला विचारले। त्याने चिटकूनच असलेल्या बालाजी मंदिरकडे बोट दाखवले। तसेच रोड वर कडेला उभ्या असलेल्या गाड्या दाखवल्या। मग सिग्नल पडल्यावर गाडी वळवुन रोड टच उभी केली। आणि पॅलेस कडे निघालो।
               बाहेर आधी तिकीट काढले। प्रति मानसी 15 रुपये होते। आत जाताना जो रस्ता होता त्याच्या दुतर्फा बाग व लाँन होते। खूप गार वाटले।
               या इमारतीची सुरुवात 1778 मध्ये हैदर अली यांनी केली होती। पण पूर्ण केली टिपू सुलतान यांनी 1784 मध्ये। या इमारतीची मुख्य शोभा ही याच्या भोवती असलेली बाग होय।यालाच दरिया-दौलत बाग असेही म्हणतात। या पॅलेसला abode of happiness असेही म्हंटले जाते।
               या इमारतीचा पाया हा खडक असून वरील इमारत ही लाकडाची आहे। तीही इमारत दोन मजली आहे हे विशेष !!
              आत गेल्यावर प्रथम खूप मोठी रिकामी जागा दिसते। त्याच्या कडेने वर जाण्यास दोन्ही बाजूस पायऱ्या दिसतात। प्रथम आत गेलो। तिथे छोट्या खोल्या आहेत। त्यात वेगवेगळे भाग पाडलेले आहेत। प्रत्येक भागात वेगवेगळी तत्कालीन चित्रे ठेवली आहेत। एक विशेष बाब म्हणजे त्याकाळी असलेले रॉकेट पण तिथे आहे। रॉकेट पाहून मन भरून आहे। मनात विचार आला , किती प्रगत युद्ध साधने होती।
                  मग बाहेर येऊन वर जाण्यास निघालो। पायऱ्या पण लाकडाच्या होत्या हे विशेष। वर गेल्यावर दोन्ही बाजूने इमारत दिसते। वरचा मजला पण लाकडाचा होता। बाहेरच्या उष्णतेचा अजिबात परिणाम जाणवत नव्हता। खूप बरे वाटले आणि मन प्रसन्न झाले। या इमारतीच्या लाकडाचे निरीक्षण केले तर अजूनही सुस्थितीत होती। मुख्य म्हणजे लाकडी पिलर मजबूत आहेत।
      इतकी मजबुती तीपण लाकडाची !!!!
             खरेच बांधणारे हात नक्कीच महान होते , असे वाटले। मग बाहेर येऊन बाग पहिली। थोडे फोटो काढले। आणि बाहेर पडलो।
              बाहेर येताच मंदिराची आठवण झाली। मग मंदिर पाहण्यास आत गेलो। हे मंदिर बालाजी चे होते। दर्शन घेतले।प्रसाद घेतला। चिटकूनच पद्मावती देवी चे मंदिर होते। तेही पहिले। खूपच आनंदी वाटले। थोडा वेळ मंदिरात बसून चिंतन केले। मगच बाहेर निघालो।
         

श्री क्षेत्र नीरानरसिंगपूर,पुणे।

                      काल कार्यक्रमासाठी अकलूजला जायचा योग आला। मी पण काही कमी नव्हतो, आलेल्या संधीचा भरपूर फायदा घ्यायचे ठरवले। सकाळी लवकरच निघालो। जाताना नीरानरसिंगपूर करायचे पक्के केले। सकाळी 10 वाजता बरोबर तेथे पोचलो।
                    गावात जाताना वाटेत एक पूल लागतो। अतिशय सुरेख पूल असा त्याचा रुबाब होता। पुलाच्या दोन्ही बाजूच्या स्ट्रीट लाईट तर परदेशात असल्या सारख्या होत्या। खूप आवडला पूल!
                 मग पुलाला वळसा घालून गावात प्रवेश केला। आधी स्वच्छता कर पावती फाडली, मगच पुढे जाता आले। थोडे अंतर गेल्यावर खुप उंचीवर देऊळ दिसले। वर जाण्यासाठी किमान 100 पायऱ्या चढाव्या लागतात। पायऱ्यांच्या पायथ्याशी उजव्या बाजूला नीरा नदीत उतरण्यासाठी घाट आहे। घाट दगडी बांधकाम केलेला आहे। हे पाहून मी मंदिराकडे निघालो। आत जाताच एक मोठी घंटा दिसली। घंटा वाजवायचा रॉड नसल्यामुळे ती सध्या बंद आहे। थोडे पुढे गेले कि मंदिराचा सभा मंडप आहे। तोही सागवानी लाकडाचा !! तसेच हा मंडप दोन मजली आहे। मंडपातून चार पायऱ्या वर गेल्यावर श्रीची मूर्ती कडे जावे लागते। पण त्याअगोदर मी त्याप्रवेश कमानी कडे पहिले। खूप बारीक नक्षीकाम केले आहे त्यावर। आत गेल्यावर दगडी सभामंडप लागतो। येथून मोबाईल बंद करावा लागतो। सुबक नक्षीदार रचनाच आहे त्या दगडी मंडपाची ! मग दर्शन घेतले। बाहेर आलो। तर समोर भक्त पुंडलिकाचे छोटे मंदिर, तेही अगदी श्रींच्या सामोरा समोरच!
             मग लाकडी सभा मंडप बारकाईनं पहिला। याचे खांब दगडी आधारावर अगदी निश्चलपने उभे होते। कोठेही वाळवीचा प्रादुर्भाव दिसला नाही। मग जवळच काचेच्या पेटीत ठेवलेल्या गरुड मूर्ती कडे लक्ष गेले। नक्षीदार रचना, कोरीवपणा, रुबाबदार अशी मूर्ती होती। या मूर्ती ची कार्तिक चतुर्दशी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत असे। कालांतरानं याची झीज झाली। व हा उत्सव बंद पडला।पण या मूर्तीचे पुनरुज्जीवन करून या काचेच्या पेटीत ठेवण्यात आली। हि मूर्ती तांदूळ व गव्हाच्या काड्या, लाकडी भुस्सा, कागद तुकडे, सुती कापड व डिंक यापासून तयार केलेली आहे। ही मूर्ती सन १८०० मध्ये या भागाचे संस्थानिक विंचूरकर यांनी आंध्रप्रदेश येथील कंपली या गावातून तयार करवून घेतली आहे। या मूर्तीवर संवर्धनसाठी लाखेचा पातळ थर देण्यात आला आहे। अशी जुनी मूर्ती पाहून मन थक्क झाले।
                  यानंतर मी मंडपाच्या बाहेर आलो। मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम चालू होते ते पहिले। शिखराच्या निम्म्या भागाला गिलावा करण्यात आला होता। सहज कुतूहल म्हणून मी या गिलाव्याला कोणते सिमेंट वापरले असे विचारले। उत्तर ऐकून थोडा वेळ शिखराकडे पाहत होतो। हा गिलावा सिमेंट मध्ये करत नसतात। त्याऐवजी चुना व अतिशय बारीक वाळू याचे मिश्रण वापरतात।तो एकजीव करायला एक मशीन वेगळी होती। त्या मशीनचा गोल फिरणारा लोखंडी भाग अंदाजे 300 किलोचा असेल। याच्या खाली वाळू व चुना रगडून बारीक केले जात होते। मग तो पातळ पदार्थ गिलाव्यासाठी वापरला जात होता। याला १०० वर्ष काहीही होणार नाही असे सांगितले गेले। तिथे मंदिराच्या भोवती दगडाचे पेविंग ब्लॉक्स बसवायचे होते। तेथे आलेले कारागीर मन लावुन काम करीत होते। त्यातले एक वयस्कर धोत्रे मामा होते। त्यांना विचारले या वयात कसे काय? त्यांच्या म्हणण्यानुसार घरी बसून काय करणार ? त्यांचा एक फोटो मी संग्रही ठेवण्यासाठी घेतला।
             यानंतर मी संगमा कडे जायचा विचार केला। बाहेर आल्यावर जुजबी चौकशी केली। संगम ५०० मीटर अंतरावर आहे असे कळले। संगमावर २० मिनिटात पोचलो। येथे भीमा व नीरा या दोन नद्यांचा संगम होतो। भीमा हि मोठी व त्यामानाने नीरा छोटी नदी। उन्हाळा असल्यामुळे दोन्ही कोरड्या होत्या। घाटावर दोन ठिकाणी दिवसाची पूजा होती। ती पाहून शेवटी कोणीही आपले नसते,ही बाब मनाला चटका लाऊन गेली।
           भीमा नदीच्या पात्रात थोड्या अंतरावर जेसिबी, पोकलंड, टिप्पर अजूनही काही यंत्रे होती। त्यासंबंधी चौकशी केल्यावर कळले कि ,तेथे एक मोठा बंधारा होणार आहे।त्यासाठी हि धावपळ होती। कारण महिन्यात नदीला पाणी येणार होते। पाणी साठणार या जाणिवेने मन सुखावह झाले। मी जड मनाने पुढे निघालो।